जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळात बोलणी फिस्कटली. जरांगे आणि सरकार एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे करत आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस आहे. आंतरवाली सराटीतून त्यांनी काल सरकारवर तोफ डागली होती. तर आज त्यांची भाषा सौम्य दिसली. पण त्याचवेळी मुंबईत धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईत मराठा आंदोलकांसह जाणार असे त्यांनी सरकारला ठणकावले. त्यामुळे सरकार आणि जरांगेमधील विसंवादाची दरी वाढल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. आता सुट्टी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या १२ सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत कधी जायचे याचा मुहूर्त ठरणार आहे. त्याची तारीख ठरणार आहे. याविषयीची माहिती जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिबिरं नेमकी कशासाठी?
मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. समाजाला हे सहन कराव लागेल.आपलं आपल्याला मिळत नाही. सरकार जाणून बुजून हे करणार आहे, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनापुरतं राबवले की आणखी काही उद्देश आहे. किंवा मिळालेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हे शिबीर काही जणांच्या सल्ल्याने ठेवले ते बघू, असा संशयही त्यांनी या शिबिराबाबत व्यक्त केला.
सरकारच्या शिष्टमंडळावर निशाणा
३ वर्षात मी कुणाचीही वाट बघितली नाही. मी माझ्या जीवावर आंदोलन करतो यायचं तर या. मुंबईत आम्ही जाणारच. १२ तारखेला जाहीर करणार. सरकारला मार्गदर्शकाच मार्गदर्शन गरजेचं आहे की तोडगा चांगला आहे. हे त्यांना कळेल. माझं कर्तव्य मि पार पडत आहे. मी लढायचं ठरवलं आहे. त्यांच्याजवळचे २-३ जण चांगले आहे. यांच्या सल्लागाराचे नाव आम्हाला माहीत झाले आहेत, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.
शिंदे-शिरसाट यांच्यावर टीका
आधी चांगली भाषा वापरत होतो.३ वर्ष शिंदेंना चांगला बोललो.हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदें आणि माझे संबंध खराब झाले. जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात.सरकारला नाही तुम्हाला शिव्या दिल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चूक केली त्यामुळे बोलणार. मी पक्षाच्या नाही जातीच्या बाजूने बोलणार असे जरांगे पाटील म्हणाले.
बबन तायवाडे यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदींची स्क्रुटनी करण्याची आणि त्या तपासण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना जरांगे यांनी टीका केली. काय तुम्ही नेते,५० टक्क्यांच्या वर गेले २ टक्के यावर बोला. आपल्याला कसं मिळालं तेही बघावं.तोही कुणबीच आहे त्याला लाज वाटली पाहिजे ५० टक्क्यांच्या वर गेलं त्यावर बोल म्हणावं. १९९४ ला दिलेलं बोगस आरक्षण त्यावर पण बोल म्हणावं, असा समाचार घेतला. त्यांनी पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.
अमृता फडणवीसांचे निमंत्रण स्वीकारले, पण...
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. अमृता फडणवीसांच्या या निमंत्रणावर आता मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत, त्यांना मी घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे. अमृता फडणवीसांच्या या विधानावर आज मनोज जरांगे यांना विचारण्यात आले. यावर ताईने सांगितले ना...मग जेवायला पण जाऊ...पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भाऊला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावे, साडीचोळी घेऊन जाऊ, असे मनोज जरांगे म्हणाले.